यावल तालुका /प्रतिनिधी
महा.लोकसंवाद न्यूज
यावल शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळा क्रमांक २ ची अवस्था पाहिल्यानंतर शिक्षण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण देण्याचे शासनाचे दावे कागदावरच असल्याचे या शाळेच्या जीर्ण अवस्थेवरून दिसून येत आहे.
शाळेच्या इमारतीचे छत झिजलेले,भिंतींवर ओलावा आणि तडे, रंग उडालेला,तसेच इमारतीची एकूणच देखभाल अत्यंत निकृष्ट असल्याचे चित्र समोर आले आहे.अशा धोकादायक इमारतीत विद्यार्थी रोज शिक्षण घेत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, शिक्षण विभागाचे अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आणि संबंधित यंत्रणा शाळांची नियमित पाहणी करत असल्याचा दावा करतात.मात्र जि.प. उर्दू शाळा क्र. २ ची प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हे दावे कितपत खरे आहेत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
शाळेची दुरुस्ती नेमकी कधी होणार? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असे संतप्त सवाल पालक आणि नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.

No comments:
Post a Comment